"सविता दामोदर परांजपे "
लेखक : शेखर ताम्हाणे
मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर' यासारख्या एकांकिका,तसेच 'सविता दामोदर परांजपे' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा असतो आणि तिचे मन 'कुसुम ' आणि 'सविता ' या दोन पात्रांमधून मांडण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न लेखकांनी या नाटकाच्या माध्यमातून केलेला आहे.
या नाटकाची म्हणजेच नाटकाच्या पहिल्या अंकाची सुरुवात शरद आणि कुसुम यांच्या घरामध्ये होते. त्यात लक्षात येते की शरद अभ्यंकर आणि कुसुम अभ्यंकर हे दोघे पती-पत्नी आहेत आणि सकाळच्या वेळी ते दोघेही डॉक्टर मलिक यांची वाट पाहत बसलेले आहेत. दोघांमध्ये होणाऱ्या संवादामधूनच लक्षात येते की, कुसुम यांच्यासाठीच ते डॉक्टर येणार आहेत. त्या कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत, हे सुरुवातीला समजत नाही.पण त्या रोजच्या आजारपणाला,डॉक्टरांच्या उपचाराला, रोजच्या दवाखान्याला कंटाळलेल्या आहेत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. त्या एके ठिकाणी म्हणतात की, 'कोणी सांगितलं आमच्या ठिकाणी आयुर्वेदिक चांगला आहे, तर त्याच्याकडे जा. तमक्याने सांगितल, होमिओपॅथिक चांगला आहे तर त्याच्याकडे जा. खरच कंटाळा आलाय हो...'. ते दोघेही डॉक्टर मलिक यांची वाट पाहत असतात. त्यावेळीच शरद कुसुमला सांगतो की, त्यांनी टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट मधील स्कॉलर अशोक देशमुख याला बोलावलेल आहे आणि त्याच्याकडून कुसुम यांच्या आजारपणावर काहीतरी उपाय निघेल असे त्यांना वाटत आहे .पुढे त्यांच्यामध्ये होणाऱ्या संवादामधूनच शरद कंपनीत जॉब करत असल्याचे आणि कुसुम कॉलेजमध्ये शिक्षिका असल्याचे समजते.
ते डॉक्टरांची वाट बघत असताना, त्या ठिकाणी अशोक देशमुख या पात्राचा प्रवेश होतो. त्यावेळी कुसुम यांना नेहमीप्रमाणे अटॅक आलेला असतो. आणि त्या अवस्थेत शरद आणि त्यांच्या भावाची मुलगी निता हे दोघे तिला बेडरूम कडे नेत असतात. त्यानंतर डॉक्टर येतात आणि कुसुमला इंजेक्शन देतात व ती शांत होते. तिला असेच अटॅक अधून मधून येत असतात त्याक्षणी अचानक तिच्या पोटात दुखते ,अशी बऱ्याचदा अशा अवस्थेत कोसळताना शरद आणि निता गेल्या आठ वर्षापासून बघत असतात. काही वेळाने डॉक्टर मलिक, शरद आणि अशोक हे तिघे ह्या विचित्र आजारपणावर चर्चा करू लागतात त्यावेळी अशोक त्यांना सांगतो की,यावर दवाखान्यातील उपचाराने काहीही फरक पडणार नाही. त्याला यात काहीतरी वेगळे जाणवते आहे. तो सांगतो की, सात आठ वर्षांपूर्वी त्यांच्या वाड्यातल्या भय्यांची आठ वर्षाची मुलगी मोठ्या बाई सारखी बोलू लागली होती. त्यावेळी इतरांप्रमाणे तो तिथे गेल्यानंतर त्याच्या अंग तापू लागले आणि ती मुलगी बऱ्याच गोष्टींची मागणी करू लागले ते सर्व तिला दिल्यावर ती मुलगी धाडकन खाली कोसळली. आणि पुन्हा त्या प्रकारचा त्रास दिला कधीही झाला नाही. आणि तशाच जाणिवा कुसुम वहिनींना मघाशी बघताना झाल्याचे तो सांगतो. या गोष्टीवर डॉक्टर अजिबात सहमत होत नाहीत.त्यांच्यात वादविवाद होताना दिसतात. पुढे हा त्रास वाढताना दिसतो सुरुवातीला कुसुम या पात्राच्या नुसते पोटात दुखत असते, परंतु पुढे पुढे तिचे आजारपण एवढे वाढते की, त्या ठिकाणी ते आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकायला लागते. आणि पुन्हा भानावर आल्यावर झालेल्या प्रकाराची तिला अजिबात आठवण राहत नाही. ज्यावेळी तिच्या वागण्यात बदल होत असतो, त्यावेळी ती ,'मी सविता दामोदर परांजपे' आहे आणि मी कुसुमला सोडून जाणार नसल्याचे एकदा सांगते. यावरून डॉक्टर मलिक आणि अशोक 'सविता' या नावामागची कहानी शरद कडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
त्यांच्या पुन्हा पुन्हा विचारल्यामुळे शरद सांगतो की, सविता ही कुसुमची जिवलग मैत्रीण होती आणि ती शरद पवार प्रेम करत होती. तशी तिने याबद्दलची कबुली त्याच्यापाशी दिली होती. पण कुसुमशी लग्न ठरल्यामुळे त्याने या गोष्टीला नकार दिला होता. पुढे ज्या दिवशी कुसुम आणि शरदचे लग्न झाले, त्याच दिवशी रात्री सविताने स्वतःला जाळून तिचे आयुष्य संपवले होते. ही सर्व माहिती ऐकल्यानंतर अशोक असा निष्कर्ष काढतो की, सविताने तिची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे कुसुम वहिनींना झपाटलेलं आहे.आणि दुसरीकडे डॉक्टर मलिक त्याच्या या म्हणण्याला नाकारत, बरेच वर्ष मूल होत नसल्यामुळे, कुसुम मानसिक दृष्ट्या खूप खचलेली आहे. आणि त्यामुळेच ती असे विचित्र वागत असल्याचे म्हणणे मांडतात.
अशोक आणि डॉक्टर मलिक त्यांच्या परीने कुसुमला तिच्या आजारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असतात. यातूनच एके दिवशी कुसुमच्या अंतर्मनातील सविता अशोक कडे शरीर सुखाची मागणी करते आणि तसे झाल्यास ती कुसुमच्या शरीराला सोडून जाईल असेही सांगते. परंतु अशोक या गोष्टीला नकार देतो आणि त्यातूनच एके दिवशी कुसुम सविताप्रमाणे स्वतःलाही जाळून घेऊन तिचेही आयुष्य संपवते.अशाप्रकारे या नाटकाचा शेवट मनाला सुन्न करून जातो.पण हे छोटेसेच असणारे, दोन अंकातील नाटक एका स्त्रीचे आयुष्य, तिचा संघर्ष, तिचे मन, तिचे अंतर्मन,तिच्या भावना आणि तिचा कोंडमारा व दुर्दशा या सर्वांबद्दल नक्कीच विचार करायला भाग पाडते.
.jpg)
Comments
Post a Comment