ज्यावेळी मी हे पुस्तक वाचायला घेतले त्यावेळी हा कथासंग्रह आहे हे मी पाहिलेले नव्हते. जेव्हा पुस्तक वाचायला सुरूवात केली तेव्हा मात्र यातील प्रत्येक कथा मनाला भिडते. ' लक्ष्मण माने ' यांच्या लिखाणात बोचरे पणा, वास्तवाची झालर आणि वाचकांच्या मनाला जागृत करण्याची अफाट शक्ती आहे. आणि त्यामुळेच यातील प्रत्येक कथा काहीतरी शिकवून जाते.त्याचबरोबर यातील प्रत्येक व्यक्तीरेखा मनाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही.यामध्ये असणाऱ्या कथा पुढीलप्रमाणे आहेत:
१) झाकली मूठ - ही कथा आहे ' आबा पाटील ' या सातारकराची आणि त्याच्या धुरणदरपणाची. कथेच्या सुरुवातीला असणारा गंभीरपना कथेच्या शेवटी थोडासा हसवून जातो. आबा पाटील यांची घरची परिस्थिती गरिबीची असते त्यामुळे ते मुंबईला जातात आणि परिस्थितीवर मात करून श्रीमंत बनतात.पण बापाच्या पैशावर मुले चैनी करतात, वाया जातात. आणि पुढे अचानक राजकारणातील बदलामुळे आबा पुन्हा गरीब बनतात. आता गरीब आबाला कोणीही जवळ करत नाही. पुन्हा म्हातारपणी त्यांचे हाल चालू होतात. आणि त्यावेळी त्यांच्या मित्राने सांगितलेल्या युक्तीमुळे त्यांचे म्हातारपण सुखात जाते. आणि मरतासमयी त्यांची झाकली मूठ बरच काही सांगून जाते.
२) गोष्ट त्याज्या जलमाची - या कथेमध्ये , मुलगा व्हावा यासाठी एका आईची चाललेली धडपड दाखवताना , नशिबाचा दुर्दैवी फेरा दाखवायला लेखक विसरलेले नाहीत. यामध्ये एक म्हातारी आपल्या नातवासह भिक मागताना पाहायला मिळते. वैदुंचा तांडा आल्यावर झालेल्या ओळखीतून म्हातारीची चित्तरकथा वाचकांना पाहायला मिळते. यामध्ये पहिल्यांदा मुलगा न झाल्यामुळे व एकापाठोपाठ मुली झाल्याने तिचा नवरा तिला घराबाहेर काढतो. ' मुलगा पाहिजे ' या समाजाच्या परंपरेमध्ये अडकलेला तिचा जीव, मुलगा होण्यासाठी आपले शरीर कुणाच्याही हवाली करायला तयार होतो. आणि त्यातूनच पुढे तिला मुलगा होतो ,त्या मुलाचा बाप तीच्यापशी न राहता पळून जातो. मग स्वतःच्या कष्टाने ती त्याला वाढवते , लग्न करून देते. आणि त्यातून नातवाचा जन्म होतो. पण दुर्दैवाने मुलगा आणि सुनेचा एका यात्रेतील हत्ती आणि घोड्याच्या दंगलीत मृत्यू होतो. आणि आता ही म्हातारी फक्त नातवासाठी जगत असते. हे वास्तव वाचताना आपल्याही मनाला तिची अगतिकता जानवल्याशिवाय राहत नाही.
३) व्हरपळ - या कथेची सुरुवात होते ती शिमग्याच्या सणाच्या वर्णनाच्या माध्यमाने. सुरुवातीलाच पुढे होणाऱ्या दहकातेची कल्पना येते. दगडू आणि पार्वती यांची लेक ' ठकी ' हिला मागणी घालण्यासाठी पाहुणे येतात. आणि पाहुण्यातील वस्तादांच्या ' तानाजिशी ' तिचे लग्न होते. पण पहिलवान वडिलांच्या धाकामुळे बायकोच्या स्पर्शासाठी तळमळणारा ' तानाजी ' दुसऱ्या बायांच्या आणि दारूच्या आहारी जातो. आणि कथेच्या शेवटपर्यंत हा यातून बाहेर निघताना दिसत नाही. याची दुसरी बाजू म्हणजे ' ठकी ' आपल्या मुलांसाठी नव्याने आणि एकटीनेच गावाच्या पाठिंब्याने उभी राहते. मुलाने बापाला मारलेला दगड आणि कुलूप फोडण्यासाठी उचललेला दगड खूप काही सांगून जातो.
४) बंड - या कथेमध्ये श्रीमंत पाटील याच्या कर्माची कहाणी सांगताना, त्याच्या मृत्यूमुळे झालेले घरातील आनंदी वातावरण खूप काही सांगून जाते. यमालासुद्धा शह देऊन दागिण्यासाठी आणि धाकट्या सुनेला पाहण्यासाठी पाटलाचा परतलेला आत्मा एकमेव आढळतो. आणि ही कथा वर्णन करताना डोमकावल्यांचे चाललेले संभाषण वाचकाला विचार करायला भाग पाडते. तसेच मेल्यानंतर पिंड शिवण्याच्या प्रथेला थोडासा विरोध करण्याचा प्रयत्न याठिकाणी पाहायला मिळतो. या पाटलाचे मोडून काढलेले बंड म्हणजे चांगल्याचा विजय असेच वाटते.
५) म्हातारचळ - ' सदामामा ' नावाच्या एका व्यक्तीच्या गंमत करण्याने ' लंका ' या मुलीचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसते. त्या मामाच्या गमतीमुळे लंका लग्नाला पहिल्यांदा तयार होत नाही आणि लग्नानंतर नवऱ्यापाशी राहत नाही. माहेरी पळून येते. पण म्हातारपणी भावाचा संसार पाहताना ,तिलाही आपला संसार असावा अस वाटायला लागते. पण तेव्हा वेळ गेलेली असते आणि ही गोष्ट तिला सहन होत नाही.
६) बाजीराव नाना - या कथेमध्ये ' हौसाबाई ' नावाची म्हातारी आणि तिचे अकारण ओरडणे पाहायला मिळते. आणि तिच्या या स्वभावामुळे सगळ्या घराचा सत्यानाश होताना दिसतो. त्यामध्ये सीता आणि बाजीराव यांचं लग्न होत आणि बाळंतपणासाठी सीता माहेरी गेलेली असताना हा बाजीराव दुसरे लग्न करतो. आणि सीता माघारी आल्यानंतर तिला तिची सावट दिसते. दोघींच्यात कडाक्याचे भांडण होते. आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लग्नाची बायको आत्महत्या करते. आणि याला जबाबदार म्हणून बाजीराव नानाला अटक करण्यात येते.
७) आग - या कथेमध्ये कोंडिराम पाटलाच्या वाड्याला लागलेली आग ही एका त्यांच्याच कुटुंबाच्या मनाची आग होती. कोंडीराम पाटलाने त्याची मुलगी शेवंताचे लग्न एका ड्रायव्हर सोबत करून दिले. तिला दोन मुले झाली. आणि मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांत तिचा नवरा मेला. त्यामुळे शेवंता खूप दुःखी झाली. त्या घटनेतील मेलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये मिळाले. आणि पैसे मिळाल्यानंतर सगळ्यांनी तिला त्रास द्यायला, मारायला सुरुवात केली. त्यामुळे शेवटी शेवंता ' बबन्या ' या नोकराबरोबर पळून गेली. त्याने तिचा फायदा घेऊन तिला नंतर हाकलून दिले. त्यातच तिला वेड लागले आणि ती पहिल्या नवऱ्याला विसरू न शकल्याने तिला जास्तच त्रास होऊ लागला. ती आपल्या लहान मुलाला जगवण्यासाठी आपला देह चार दोन रुपयांसाठी विकायला लागली. हे एकदा तिच्या थोरल्या मुलाने पाहिले आणि त्याच्या मनात भडकलेल्या आगीने त्याला गावाला आग लावण्याचे समाधान दिले. पण तोही उसाला लावलेल्या आगीत जळून गेला.
८) रोजच मड त्याला कोण रड - या कथेची कहाणी वेगळीच आहे. यामध्ये गणपा पाटलाची मुलगी ' सीता ' वयात आल्यावर तिचे लग्न केले जाते. पण मूल झाल्यावर नवऱ्याचा अपघात होऊन त्यात तो मरतो. माहेरी आल्यावर जो तो आपापल्या कामात असल्याने सीताही कामाला जाऊ लागते आणि एका गवंड्याबरोबर तीच जमतं. समाजात दुसरं लग्न करता येत नसल्याने ती आपल्या सख्ख्या बहिणीचा बळी देण्याचे ठरविते. आणि ' मधूचे ' लग्न ठरते. पण आपल्या थोरल्या बहीनिनेच गळा कापल्याचे लक्षात आल्यावर कालांतराने ती अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेते आणि त्यातच ती मरते.यामध्ये तिला आपल्याच माणसाच्या विश्वासघात की पणाची भावना मरण्यास प्रवृत्त करते.
९) सर्ग इतभरच राहीला व्हता - या कथेत देवाला सोडलेली ' जानी ' नावाची गाय आणि तिन जन्म दिलेला ' कठाळ्या' यांची वर्णन करणारी माहिती आणि गावकऱ्यांचा लळा याबद्दल सागिंतले आहे.
१०) हाऱ्या नाऱ्या - या कथेमध्ये जानीच्या मृत्यूनंतर ' कठाळ्याने ' गावात मांडलेला हैदोस हाऱ्या नाऱ्या या जोडीने कसा मोडून काढला याची चित्तरकथा सांगण्यात आली आहे.
११) ती चंपा - एका पाकीट माऱ्याच्या जीवनात क्षणासाठी आलेली स्त्री आणि पुन्हा कधीच न भेटलेली आणि वेश्या व्यवसाय करताना मेलेल्या भावनांची ती चंपा वाचकांच्या ही लक्षात राहते.
१२) गलांगु - ही कथा भटक्या जमातीतील लोकांच्या परक्रमासारखी वाटते. त्यामध्ये आपल्या गावच्या राजाला मदत करण्यासाठी धावलेली ही जिगरबाज माणसं मरतात पण इंग्रजांना शरण जात नाहीत.
अशा प्रकारे यातील प्रत्येक कथा वाचताना या कथासंग्रहात दिलेले ' उध्वस्त ' हे नाव सार्थक असल्याचे जाणवते.
Comments
Post a Comment