'वन लिटल फिंगर ' हे मालिनी चीब' यांचे आत्मचरित्र आहे. आपल्याजवळ सर्व काही असूनही आपण छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करत असतो. पण ज्यावेळी 'मालिनी चीब' यांची जीवनकहाणी वाचतो, त्यावेळी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. हे पुस्तक वाचणे म्हणजे नकारात्मक विचारसरणी मधून बाहेर पडण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे, असे म्हणायला हरकत नाही.
हे आत्मचरित्र तीन भागांमध्ये विभागलेले आहे. सुरुवातीला त्यांचा जन्म, त्यानंतर त्यांनी घेतलेले शिक्षण आणि तिसऱ्या भागामध्ये स्वावलंबी बनण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न याबद्दल लिहिलेले आहे. या पुस्तकाची सुरुवात होते, ती लेखिकाच्या जन्माच्या प्रसंगापासून. १९६६ मध्ये कोलकाता येथे वुडलैंड नर्सिंग होम मध्ये ४० तास प्रसूती वेदना त्यांच्या आई सहन करत होत्या. आणि त्या सगळ्या प्रकारात मालिनी यांच्या मानेभोवती नाळ गुंडाळली आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा काही क्षणापुरता बंद झाला. आणि त्यांना त्यामुळे कायमचे अपंगत्व आले.डॉक्टरांना असे वाटत होते की, त्या जगणार नाहीत; परंतु त्या जगल्या. नुसत्या जगल्याच नाही तर प्रेरणादायी जीवन जगल्या. याची जाणीव हे पुस्तक वाचताना येते. त दीड वर्षाच्या झाला तरी इतर मुलाप्रमाणे त्यांच्यामध्ये प्रगती दिसत नव्हती, हालचाली मंद होत्या, उठून बसता येत नव्हते, हात पाय हलवता येत नव्हते. अशा प्रकारचे अपंगत्व पूर्ण कुटुंबांसाठी धक्कादायक होते. भारतातील डॉक्टरांनी त्या मंदबुद्धी असल्याचे तुटकपणे सांगितले होते. घरची परिस्थिती चांगली असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना इंग्लंडमधील डॉक्टरांकडे नेले. आणि त्या ठिकाणचे वैद्यकीय उपचार आणि शिक्षण भारतापेक्षा खूपच आघाडीवर होते. त्यांनी मालिनी यांची बुद्ध्यांक चाचणी केली आणि बुद्ध्यांक १२० आला. याचाच अर्थ त्या मंदबुद्धीच्या नव्हत्या. आसपास काय चालले आहे, हे त्यांना समजत होते. आणि यातूनच त्यांच्या आत्मचरित्रात असे समजते की, भारतातील डॉक्टरांचे म्हणणे चुकीचे ठरले होते.
केंब्रिज येथील रॉजर विद्यालय मधून त्यांना चेने वॉक, चेल्सी,लंडन या शाळेत प्रवेश मिळाला. त्याठिकाणी त्यांना उत्तम शिक्षण आणि उपचार दोन्ही मिळाले. प्रत्येक जण त्यांच्याशी सर्वसाधारण मुलीशी जसे वागतात तसे वागयाचे. आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी प्रेरणादायी अशीच होती. काही दिवसांनी कुटुंबातील सर्वजण मुंबईत आले आणि त्यांच्या आईने १९७० मध्ये मुंबईत 'सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन ' या संस्थेची स्थापना केली. आपल्या मुलीला त्यांनी जे झोपताना पाहिलेलं होतं, त्यातूनच त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आलेली होती. थोडा कामाचा व्याप वाढल्यामुळे,त्यांची आई वडील एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे त्याचा परिणाम घटस्फोटामध्ये झाला. पुढे मालिनी चीब या पंधरा वर्षाच्या असताना त्यांना व्हीलचेअर देण्यात आली आणि काही दिवसांनी त्यांच्या आवडत्या ठिकाणी इंग्लंडला त्यांना पुन्हा शिकण्यासाठी पाठवण्यात आले. पुढील शिक्षणासाठी सेंट झेवियर्स कनिष्ठ महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला. महाविद्यालयात नॉर्मल मुलांसोबत शिकत असताना,त्यांना खूप अडचणी येत होत्या. सुरुवातीला त्यांना नीट बोलता येत नव्हते आणि त्यामुळे संवाद साधने खूप अवघड जात होते.पण हळूहळू त्यांना ते मित्र-मैत्रिणी भेटल्या आणि लेक्चर करण्यासाठी वर्गात जाण्यासाठी प्रत्येक जण त्यांना मदत करू लागले आणि आहे त्या परिस्थितीला संघर्ष करत त्या बीए झाल्या.
पुढे पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिकेत 'बर्कले ' शहराला भेट दिली. त्या ठिकाणी त्यांना बऱ्याच इलेक्ट्रिक व्हीलचेअर दिसल्या. प्रत्येक ठिकाणी,कुठेही व्हीलचेअर नेता यावी यासाठीची त्या ठिकाणी उत्कृष्ट सोय होती. त्या ठिकाणी अपंगांचा आदर केला जात होता,त्याचप्रमाणे अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या बऱ्याच संघटना त्या ठिकाणी कार्यरत असल्याचे त्यांना जाणवले. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना एक प्रेरणा मिळाली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला. आणि तिथे शिकण्यासाठी त्यांना स्कॉलरशिपही मिळाली. त्यांना असणाऱ्या मर्यादांना झुगारून,त्या शिक्षण घेतात. आणि वाचकांसमोर एक आदर्श ठेवतात. त्याचप्रमाणे 'संवहन व संवाद ' या विषयावरील चर्चासत्रात त्यांना बोलावले होते. त्या ठिकाणी त्यांच्यापेक्षा विकलांग अवस्थेत अनेक जण होते. ते सर्वजण मुक्तपणे संवाद करू शकत होते. मालिनी चिब यांना बोलताना कष्ट पडत होते; तेव्हा त्यांना वाटले की कुणाचीही मदत न घेता बोलता यायला पाहिजे.त्याकरता डॉक्टरांकडून ' दी टॉबी चर्चिल ' हे उपकरण घेण्यास सांगण्यात आले. या उपकरणाच्या माध्यमातून त्या सर्वांशी, कुणाचीही मदत न घेता बोलू लागल्या. इलेक्ट्रिक व्हीलचेअर आणि लाईट रायटर च्या माध्यमातून त्या सर्वांशी बोलू शकत होत्या आणि सुरुवातीला अवघड वाटणारी बरीचशी कामे कोणाचीही मदत न घेता करू शकत होत्या. आपल्या मैत्रिणी सोबत कुटुंबातील कुणालाही सोबत न घेता फ्रेंच मध्ये त्या जाऊन आल्या. एका छोट्या बोटाच्या मदतीने, त्या संगणकावर काम करू लागल्या. दोन पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 'ऑक्सफर्ड बुक शॉपमध्ये ' मुंबईत सीनियर इव्हेंट्स मॅनेजर ' म्हणून त्यांना नोकरी मिळाली. त्या म्हणतात की, त्यांनी त्यांचे छोटे बोट पन्नास हजार वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा वापरलेले होते.आयुष्य सहज आणि सोपे नक्कीच नव्हते पण त्यांनी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. लेखिका या पुस्तकात लंडनमधील दिवसांचा उल्लेख आयुष्यातील अनमोल ठेवा असा करतात. त्यामानाने भारतात असताना बरेच प्रसंग नकारात्मकता, निराशा देऊन गेल्याचेही त्या सांगतात. बाहेरील देशात अपंग लोकांना सन्मानाची वागणूक दिली जाते आणि या उलट भारतात अपमानकारक वागणूक बऱ्याचदा मिळाल्याचं त्या सांगतात. नोकरी करत करत त्या पुढे प्रेरणादायी भाषणे देऊ लागतात.
आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी तक्रार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी 'मालिनी चीब ' यांची जीवनकथा डोळ्यात अंजन घालण्याचे काम करते. आणि त्यामुळे अर्थपूर्ण जीवन समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचकांनी नक्की वाचायला हवे.
Comments
Post a Comment