एक हाडाची शिक्षिका आणि समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या 'सुधा मूर्ती ' यांचा जन्म कर्नाटक मध्ये शिगावी याठिकाणी १९५० मध्ये झाला. त्यांनी कम्प्युटर सायन्स मधील एम.टेक. पदवी मिळवली आणि 'टेल्को ' कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंता होत्या. त्याचप्रमाणे समाजातील गरिबातील गरीब लोकांपर्यंत मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या 'इन्फोसिस फाउंडेशनच्या ' त्या अध्यक्षा आहेत.समाजकार्य आणि साहित्यसेवा याकरीता त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. समाजकार्याची धुरा सांभाळत असताना असंख्य खेड्यापर्यंत त्या जात असत आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी, त्यांना आलेले अनुभव वाचकांपुढे ठेवण्याचा एक सुंदर प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकांमध्ये ५१ अनुभव कथा, लयबद्ध शब्दातून लेखिका आपल्यासमोर ठेवतात.
या पुस्तकात असणाऱ्या पहिल्या कथेमध्ये 'हनुमंतप्पा ' या मुलाचा फोटो दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल वर्तमानपत्रात आलेला असतो, त्यांचे त्याकडे लक्ष जाते. अनेक मुलांचे फोटो आलेले असतात, त्यापैकी एका फोटोपाशी लेखकाची नजर खिळून राहते आणि त्याविषयी अजून जाणून घ्यावे असं त्यांना वाटतं. दुसऱ्या दिवशी त्याच मुलाची मुलाखत वर्तमानपत्रात आली होती आणि त्यावरून त्यांना समजले की, तो एका आदिवासी जमातीतील होता आणि घरच्या गरीब परिस्थितीमुळे तो पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हता. तेव्हा त्यांनी त्याला भेटण्यासाठी बोलवले आणि त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी त्या स्वतः घेणार आहेत असं सांगितलं.त्या दर महिन्याला पैसे पाठवत असत, एकदा सहा महिन्याचे पैसे त्यांनी एकदम पाठवले होते. पण दोन महिने घरी असल्यामुळे, ते पैसे परत पाठवि णारा हा मुलगा प्रामाणिकपणातील उत्कृष्ट उदाहरणाच्या रूपात त्यांच्या मनामध्ये घर करून राहतो. त्यानंतरची कथा आहे, त्याच्यामध्ये स्वतःबद्दल बढाई मारणाऱ्या एका माणसाच्या स्वभावाबद्दलचे गमतीदार वर्णन त्या वाचकांपुढे ठेवताना दिसतात. समाजकार्यामुळे प्रवास करण्याची आवड ,यामुळे एकदा लेखिका अशाच कर्नाटक मधील जंगलाच्या प्रदेशातील एका आदिवासी वस्तीतील शाळेला भेटायला जातात.त्या ठिकाणी पोहचल्यावर, त्यांनी त्या मुलांना देण्यासाठी काही वस्तू आणलेल्या असतात. त्या वस्तू दिल्यानंतर एक ९० वर्ष अधिक वयाचा एक वृद्ध 'सुधा मूर्ती ' यांना रानटी फळांपासून बनवलेले पेय बाटलीतून देतो आणि ते घेण्याची विनंती करतो. पहिल्यांदा तर लेखिकेला असं वाटतं की, गरीब लोकांकडून कसं काय घ्यायचं, पण 'काहीतरी दिल्याशिवाय घेऊ नका आणि घेण्यात सुद्धा मोठेपणा असतो ' अश्या प्रकारची वाक्ये त्या व्यक्तीकडून ऐकतात , त्यावेळी जीवनाचे एक मोठे तत्त्वज्ञान लेखिका त्या प्रसंगातून शिकतात. पुढच्या एका कथेमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती मरण पावलेली असते, पण लेखिका त्यांना भेटायला गेल्यानंतर ,त्या ठिकाणी कुणीच दुःखी दिसत नाही. उपयोगानुसार दुःखाचे गणित मांडले जाऊ लागले आहे की काय? हा प्रश्न त्यावेळी त्या कथेतून वाचकांपुढे उलगडताना, विचारांना प्रवृत्त करणारा वाटतो.तसेच पुढे एका कथेमध्ये त्या, एक ऑपरेशन करत असताना डॉक्टर सोबत नर्सला किती प्रामाणिकपणे काम करावे लागते याबद्दल सांगतात. पुढे यातील आणखी एक कथा खूपच छान आणि डोळ्यांत अंजन घालणारी आहे. एक मुलगा, आपल्या स्वतःच्या वडिलांची ओळख लपवून त्यांना 'सुधा मूर्ती ' यांच्याकडे घेऊन येतो. आल्यानंतर तो त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी सांगतो. पुढे काही दिवसानंतर ,त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आणि तोच मुलगा वडिलांच्या बँकेच्या पासबुक वरील पैशांवर हक्क सांगतो आणि ही कथा वाचत असताना यापेक्षा वाईट अजून काय असू शकतं? हा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो. त्याचप्रमाणे पुढील एका कथेमध्ये, काळानुसार विचारांमध्ये कशाप्रकारे परिवर्तन होत असतं; याबद्दलचा गमतीदार संवाद चित्रित केलेला आहे. 'तारेचा घोटाळा ' कथेमध्ये पत्राचा अर्थ न समजल्यामुळे झालेला गोंधळ लेखिका वर्णन करतात. या कथांप्रमाणेच 'मला भेटलेला अतिशहाणा ', 'राखीच्या दिवशी तुटलेले बंधन ', 'एका भिकाऱ्याने दिलेला धडा ' , 'आधी डोकेदुखी द्या, मग औषध घ्या ' यासारख्या अनेक गमतीदार कथा त्यांच्या प्रवासात ,त्यांना आलेल्या अनुभवातून, मानवी स्वभावाचे जगावेगळे रहस्य त्या उलगडताना दिसतात.
या पुस्तकातील प्रत्येक कथा, समाजभान ठेवून जगत असताना, अनेक मूल्ये अंगीकारणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक प्रसंगातून आणि प्रत्येक अनुभवातून शिकता यायला हवे,असे लेखिका सांगतात. या पुस्तकातील प्रत्येक कथेतून, जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन समजायला मदत होते. अतिशय मनमोकळ्या शब्दातून लेखिकेने या कथा वाचकांसमोर ठेवल्या आहेत आणि त्यामुळे यातील प्रत्येक कथा काही ना काहीतरी बोध देऊन जाते. कथा लहान असल्या तरी त्यातून जो उपदेश मिळतो, तो खऱ्या अर्थाने लाखमोलाचा आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कथा रुपी असणारे आणि अनुभव मिश्रित वास्तवाचे भान जपण्यासाठी गरजेचे असणारे हे पुस्तक, प्रत्येक वाचकाने नक्की वाचायला हवे.
Comments
Post a Comment