हे पुस्तक वाचत असताना सावित्रीबाई फुले यांना लेखकांनी वाचकांसमोर ठेवण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक एका बैठकीमध्ये संपण्यासारखे आहे परंतु; यामधून महत्त्वाच्या खूप साऱ्या गोष्टी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दलच्या समजतात.
या पुस्तकाची सुरुवात होते ती सावित्रीबाई फुले यांचा जन्म होण्याच्या अगोदर पासून. यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या गावामध्ये मोठ्या हौसेने बारसे केले, याबद्दल समजते. ज्या काळात मुलींना जन्माला घालणं म्हणजे शाप समजला जात होता, त्या काळात त्यांच्या वडिलांनी सावित्रीबाई फुले यांचा जन्म मोठ्या आनंदात साजरे करणे ही गोष्ट खूप मोठी होती. आणि ती समाजाला परवडण्यासारखी पण नव्हती. पुढे त्यांच्या मनामध्ये समाजात बदल करण्याची ज्योत तयार झाली,त्या पाठीमागे नक्कीच त्यांच्या वडिलांचा विचार, संस्कार कारणीभूत होते असेच म्हणावे लागेल. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा संसार फुलू लागला. परंतु; त्यांच्या मनामध्ये शिक्षणाची ओढ ही खूप लहानपणापासूनच होती. याबद्दल एक प्रसंग या पुस्तकामध्ये सांगितला आहे.एकदा त्या आपल्या मैत्रिणीसोबत बाजार पाहण्यासाठी गेलेल्या होत्या , त्यावेळी काही मिशनरी लोक पुस्तक विकण्यासाठी बसले होते, तेथील पुस्तक त्या घेऊन येतात आणि त्यातील चित्रे पाहत असताना, आपल्याला जर वाचता येत असते तर, किती बरे झाले असते, हा विचार खूप लहान असताना त्यांच्या मनामध्ये आलेला दिसतो .पुढे हाच विचार, ज्यावेळी त्या जोतिबा फुले यांच्या पत्नी बनतात,त्यावेळी तो खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जातो. त्यांच्या बालपणीचे दोन-तीन प्रसंग या पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकांनी सांगितले आहेत. त्यामध्ये एक प्रसंग असा होता की, एका नागाला त्या न घाबरता मारतात ,हे पाहण्यासाठी पूर्ण गाव लोटलेले असते, यावरून लहानपणीच त्या किती धाडसी होत्या याबद्दल समजते. दुसऱ्या एका प्रसंग मध्ये, त्या आपल्या एका नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या आणि त्यांच्या आईने त्यांना लवकर घरी या असे सांगितले होते.परंतु त्यावेळी मोठे वादळ आणि पाऊस आल्यामुळे लोकांनी सावित्रीबाईंना थांबण्यासाठी सांगितले.परंतु अशा परिस्थितीतही त्याठिकाणी न थांबता, भर पावसात आपल्या घरी आल्या. यावरून त्यांच्या स्वभावातील जिद्द आणि करारी बाणा लक्षात येतो.
सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने एका क्रांतीची सुरुवात होते.ज्यावेळी महात्मा जोतिबा फुले आपल्या मित्रांसोबत चर्चा करत असायचे, त्यावेळी ती चर्चा सावित्रीबाई ऐकायच्या आणि त्यांच्या असे लक्षात आले की, समाजामधील अज्ञान दूर करणे, हे सगळ्यात मोठे संकट आहे. त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व लक्षात यायला हवे. ज्या काळात मुलींना शिक्षण देणे,हे पाप समजले जात होते. त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देण्याचे ठरवले आणि इथूनच खऱ्या अर्थाने, माझ्या मते मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. सावित्रीबाईंनी फुले यांनी शिक्षण घेतले, पुढे त्यांनी इंग्रजी मिशनरी स्कूलमध्ये शाळेमध्ये शिकवण्याचे ट्रेनिंग घेतले. आणि भिडे वाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या ठिकाणी शिकवण्यासाठी जाऊ लागल्या.ज्या काळामध्ये मुलींचा जन्म होणे हे देखील पाप समजले जात होते, त्या काळात मुलींना शिकवण्याचे काम सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांनी हाती घेतले.हे नक्कीच सोपे नव्हते परंतु; हे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पेलले. ज्यावेळी सावित्रीबाई शिकवण्यासाठी जायच्या त्यावेळी अनेक सनातनी लोक त्यांच्या अंगावर दगड, शेण, खरकटे पाणी टाकायचे, परंतु त्या घाबरले नाहीत. आणि त्यांनी शिक्षणाचे काम सुरूच ठेवले. परंतु ज्यावेळी त्यांच्या अब्रूवर घाला घालण्यासाठी, एक गुंड येत होता.त्यामुळे मात्र त्यांनी त्याच्या थोबाडीत मारले.यावरून त्यांचा निर्भीडपणा या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढे या दाम्पत्यांनी विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध बंदिगृहाची स्थापनाही केली. यावरून असे लक्षात येते की, त्यांनी फक्त शिक्षणाचे काम घेतले नाही तर, समाजामध्ये ज्या अनिष्ट चालीरीती प्रथा परंपरा होत्या त्या नष्ट करण्यासाठीचा प्रयत्न केला. हे दोघेही एकमेकांशिवाय अपूर्णच होते.पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू होतो ,त्यावेळी त्यांचे दत्तक पुत्र यशवंत याला त्यांच्या समाजातील लोक अग्नी देण्यास प्रतिबंध करतात.त्यावेळी सावित्रीबाई स्वतः दहनविधी पार पाडतात. यावरून एक संयमी,साहसी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. आपल्या दत्तक मुलाला 'यशवंताला 'त्या डॉक्टर बनवतात आणि ज्यावेळी भारतामध्ये प्लेगची साथ येते,त्यावेळी अशा रुग्णांची सेवा करण्यासाठी त्या त्याला बोलावून घेतात. असे सेवेचे कार्य त्या शेवटपर्यंत करताना दिसतात. त्यांनी एका रुग्णालाही आपल्या पाठीवरून घरी आणले होते त्यातच त्यांना संसर्ग झाला आणि समाजकार्य करत असतानाच त्यांना मृत्यू ओढावला.
त्याप्रमाणे या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे त्यांनी लिखाण केलेले पाहायला मिळते.त्यांचे ' काव्य फुले ' आणि ' सुबोध रत्नाकर ' हे काव्यसंग्रह आहेत. यातून त्यांची लेखनशैली आणि विचारांतील प्रभुत्व प्रकर्षाने समजते. आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीत पुढाकार घेतला, याचाही उल्लेख या पुस्तकात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं शोध महात्मा फुले यांनी घेतल्याची माहिती शेवटी सांगितली आहे.अशा प्रकारे पुस्तक लहान असेल तरी त्यातील माहिती खूपच मार्गदर्शक आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक वाचकप्रेमिने हे पुस्तक नक्की वाचायला हवे.
Comments
Post a Comment