Skip to main content

ओळख एका पुस्तकाची..." मालगुडी डेज"- "आर. के. नारायण "....मराठीत अनुवाद - मधुकर धर्मापुरीकर

 "मालगुडी डेज"- आर. के.नारायण

                  मराठीत अनुवाद - मधुकर धर्मापुरीकर 

        "मालगुडी डेज " हे "आर. के. नारायण " यांचे पुस्तक म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण अनेक लोकांना बघत असतो, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव  वेगळा असतो, या सर्वांचे चित्रण आहे.  या पुस्तकात लेखकांनी "मालगुडी " या काल्पनिक गावामध्ये, त्यांना भेटलेल्या आणि त्यांना भावलेल्या व्यक्ती यांचे  अत्यंत सुंदर पद्धतीने वर्णन केलेले आहे. त्यांची लेखन करण्याची शैली अतिशय उत्कृष्ट आहे, कारण प्रत्येक कथा वाचत असताना आपल्याला त्यातून बोधक मिळतोच परंतु; ती व्यक्ती त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने रंगवलेली आहे आणि त्यामुळेच ते पात्र आहे तसे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. त्यामुळे या पुस्तकातील गाव जरी काल्पनिक असले तरीही त्यातील व्यक्तिमत्वे आपल्याला अनेक ठिकाणी भेटत असतात. या पुस्तकामध्ये एकूण 32 कथा आहेत आणि प्रत्येक कथा खूपच सुंदर आहे. या पुस्तकातील प्रत्येकाचा थोडक्यात सारांश पुढील प्रमाणे आहे : 

         १) ज्योतिषाचा दिवस :

                या कथेमध्ये लेखक एका ज्योतिषाचे वर्णन करतात. ते करत असताना, त्यांनी त्याच्याजवळ असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे अचूक वर्णन केलेले आहे. यावरून लेखक प्रत्येक गोष्टीचे किती बारकाईने निरीक्षण असेल हे समजयलाही मदत होते. सगळे येणारे गिऱ्हाईक यांच्याशी ज्योतिषी बोलत असताना, त्याच्या मनातील भाव या कथेमध्ये प्रकट होतात. त्यामध्ये सांगतात की, ज्योतिषाकडे पण एक कसब असते आणि त्यामुळे कोणताही व्यक्ती हात दाखवायला आल्यानंतर त्या व्यक्तीच्या बोलण्यातूनच निम्म्या प्रश्नांची उत्तरे ज्योतिषाला मिळत असतात.आणि बऱ्याचदा समोर समस्येने ग्रस्त असणारी व्यक्तीच, आपल्या चेहऱ्यातून व्यक्त होत असते. आणि त्यामुळे ज्योतिष पाहणाऱ्या व्यक्तीला किंवा ज्योतिषाला जास्त काही कष्ट पडत नाहीत आणि त्यामुळे बरेचसे अंदाज खरे ठरतात. दुसरी गोष्ट अशी असते की,ज्योतिषी ज्या भाषेमध्ये बोलत असतो, ती भाषा आणि त्याने बांधलेले अंदाज सरावाने इतके पक्के झालेले असतात की; समोरच्या व्यक्तीलाही समजत नाही आपली फसवणूक होत आहे.त्यामध्ये या गावामध्ये असणारा हा ज्योतिषी एका व्यक्तीचा खून करून गाव सोडून आलेला असतो आणि याची खंत त्याच्या मनात नेहमी सलत राहत असते. एके दिवशी ज्या व्यक्तीचा खून केलेला होता, तीच व्यक्ती त्या ज्योतिषाकडे काहीतरी विचारायला लागते. तो जिवंत आहे याचा त्याला खूप आनंद होतो आणि त्यामुळे त्याचा हात बघून त्याच्याबद्दल सगळी माहिती अगोदरच माहीत असल्यामुळे, ती माहिती सांगून ज्योतिषी त्याला खुश करतो. आणि तुला मारणारी व्यक्ती एका ट्रकखाली सापडून मरण पावली आहे आणि  त्यामुळे तू तुझ्या गावी परत जा आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस असा सल्ला  देतो. त्याच्याकडूनच  साडेबारा आणे घेऊन येतो. अशा प्रकारे या कथेच्या माध्यमातून वास्तवाची झलक वाचकांपुढे मांडलेली आहे. 

    या कथेतील मला आवडलेली मला आवडलेले वाक्य: 

      "त्याच्याकडे येणाऱ्या अजान अशा माणसांच्या ग्रहांबद्दल त्याला जेवढे अज्ञान तेवढेच स्वतःच्या आयुष्यातल्या ग्रहाबद्दल होते. तरीही त्याच्याकडे येणारा माणूस त्याच्या बोलण्यात गुंतून जायचा, चक्कीत व्हायचा, त्याचे समाधान व्हायचे. हे सगळे ते केवळ सवयीने, अभ्यासाने आणि धुर्तपणाने अंदाज बांधायच्या त्याच्या  चलाखीने."

           २)चुकलेले टपाल:

           या कथेमध्ये 'थनप्पा ' या पत्रव्यवहार करणाऱ्या पोस्टमनच्या माणुसकीची जाणीव करून दिलेली आहे. सुरुवातीला या कथेचे वर्णन करताना लेखक सांगतात की, हा पोस्टमन फक्त पत्र व्यवहार करायचा नाही. तर त्या पत्रातील संदेश वाचून ते पत्र पोहोचवणाऱ्याला  देण्याचे काम करत असे. त्यामुळे त्याच्याकडे असणारा कामाचा भाग जरी कमी असला तरी, प्रत्येकाबरोबर बोलण्याचा त्यांच्या सवयीमुळे , त्याच्या स्वभावामुळे ते पत्र पोहोचण्यासाठी त्याला खूप वेळ लागत होता. आणि यातूनच अनेक लोकांशी पोस्टमनचे भावनिक नाते जमले होते. असेच एक नाते जमले होते ते,रामानुजन या एका लिपीकाशी. रामानुजन यांना मुलगी झाली आणि त्या वेळचे पत्रही त्यांना पोहचवायला आला होता आणि त्यानंतर काही वर्षांनी हीच मुलगी लग्नाच्या वयाची झाली तेव्हाही पोस्टमन पत्र पाठवण्याचे कामच करत होता. त्यांच्याशी बोलत असताना त्याला जाणवले की कामाक्षीच्या लग्नाची सर्वाना चिंता आहे. आणि त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करून  एका पत्राचे उत्तर आले आणि त्यामध्ये कामाक्षेला घेऊन नवऱ्या मुलाच्या घरातल्यांनी त्यांना दिल्लीला बोलावले होते. त्यातूनच हे लग्न यशस्वीरित्या पार पडते. त्यानंतर एके दिवशी सुट्टी आहे याची खात्री करून पोस्टमन एक टेलिग्राम घेऊन जातो, त्यामध्ये एक वाईट बातमी असल्याचे सांगतो.  त्यांचे काका यांचा मृत्यू झाल्याचे समजते परंतु; त्यावर तारीख पाठीमागची असते आणि त्याबद्दल विचारल्यावर पोस्टमन सांगतो की, हे पत्र कामाक्षेचे लग्न होते, त्याच दिवशी मिळाले होते परंतु; ही गोष्ट तुम्हाला समजली तर तुम्ही लग्न न करता तिकडे गेले असता. पत्र पाठवण्याच्या कामामधून माणुसकी जपण्याचा एक सुंदर प्रयत्न  या कथेमध्ये दिसतो. 

          ३) डॉक्टरचा शब्द :

       या कथेमध्ये डॉक्टर रामन आणि त्यांचा मित्र यांच्यातील मनाला स्पर्श करणारी कथा या ठिकाणी वाचकांसमोर ठेवण्यात आली आहे. हे डॉक्टर गावामध्ये खूप प्रसिद्ध होते आणि प्रत्येक गोष्ट खोटी न सांगता, आहे तसे सांगण्याचे त्यांचे कसब होते. आणि त्यामुळे फसवणुकीचा कोणताही प्रकार ते  करत नसत परंतु; ज्यावेळी आपल्या मित्रावर उपचार करण्याचे प्रसंग त्यांच्यावर येतो, त्यावेळी त्यांना खोटे बोलावे लागते. आणि 'तुला काहीही होणार नाही ' या शब्दावर त्यांचा मित्र सरळ होतो.यावरून डॉक्टरच्या शब्दाला किती महत्त्व असतं हे या कथेच्या माध्यमातून समजते. 

      ४) पहारेकऱ्याची भेट :

       ज्यावेळी एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज होतो आणि त्यामुळे  कशा प्रकाराच्या घटना घडत असतात, त्याबद्दल या कथेमधून समजते. या कथेमध्ये 'गोविंद सिंग'  युद्धकाळात सैन्यामध्ये काम करीत होते. ही सेवा केल्यानंतर, एका कंपनीचा  ऑफिसर म्हणून त्या ऑफिसचा पहारेकरी म्हणून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. खाकी गणवेश आणि खांद्यावर चकचकीत पट्टा देण्यात आला, हातामध्ये एक छडी देण्यात आली. ज्यावेळी जनरल मॅनेजर आपल्या कारमधून उतरायचे तेव्हा अटेंशन होऊन त्यांना सलाम ठोकण्याचे काम गोविंद सिंग करत असत. अशाप्रकारे २५ वर्षे त्याठिकाणी नोकरी केली आणि त्यानंतर पेन्शन साठी अर्ज केला. पेन्शन मंजूर झाल्यानंतर त्याचे आयुष्य खूप छान पद्धतीने चाललेले होते. हे करत असतानाच पुढे ,आपला वेळ त्याने देखावा बनवण्यामध्ये घालवण्याचे ठरवले. त्या ऑफिसचा सुंदर देखावा त्याने तयार केला आणि ऑफिसमध्ये नेऊन दिला. पुढे आपल्या गावाचाही सुंदर असा देखावा त्याने तयार केलेला होता.एके दिवशी अचानक एक लिफाफा आला आणि आपण जी सुंदर भेट दिलेली होती, त्यामुळे मोठ्या साहेबांना राग आला असेल आणि म्हणून पेन्शन बंद केली आहे, अशा प्रकारचे काहीतरी त्यामध्ये लिहिलेले असेल, अशी शंका त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळे ते पत्र वाचून न घेता तो इकडे तिकडे वेड्यासारखा फिरू लागला. त्याने स्वतः तयार केला देखावाही मोडून टाकला. पण ज्यावेळी शेवटी असताना फिरत असताना, त्या ऑफिसचा लेखापाल होता त्याने ते पत्र त्याच्या हातातून हिसकावून घेतले आणि पाहिले तर त्यामध्ये त्याने केलेल्या देखाव्याबद्दल शंभर रुपयाचे बक्षीस होते. आणि हा छंद  असाच कायम राहावा म्हणून हे बक्षीस ऑफिस साहेबांच्याकडून त्याला देण्यात आले होते. हे समजल्यानंतर मात्र त्याने देखावा बनवण्याचा छंद सोडण्याचा निर्णय घेतला. या कथेमधून गोविंदा सिंगचे मानसिक स्थिती नको त्या विचाराने कशी बदलते हे खूप विनोदी पद्धतीने या कथेमध्ये सांगण्यात आलेले आहे. 

    ५) आंधळा कुत्रा : 

             या कथेमध्ये एक भिकारी दाखवण्यात आला आहे. तो भिकारी आंधळा असतो आणि त्यामुळे अनेक जण त्याच्या ताटातील भीकही नेत असतात.आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला एक कुत्रा असतो, त्यालाही खायला मिळत नसते.  मात्र तो तिथेच फिरत असतो. एके दिवशी तो आंधळा भिकारी, कुत्र्याला घेऊन जातो आणि त्याला अन्न हे देतो. हा एक प्रसंग या दोघांच्या मैत्रीला कारणीभूत ठरतो. त्या दिवसापासून तो कुत्रा त्या आंधळा भिकाऱ्याच्या पाठीमागे सतत राहू लागतो. कोणी त्याच्या ताटातील भीक घेत असेल, तर तो अंगावर जात असे. पण त्या कुत्र्याच्या असण्याने पुढे -पुढे भिकाऱ्याला जास्त भीक मिळू लागली आणि त्यामुळे तो उन्मत्त वागू लागला.

          त्याने त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये  साखळदंड अडकवला आणि तो त्याला नेहमी स्वतःबरोबर घेऊन जाऊ लागला.  भिकाऱ्याला दिसत नसल्यामुळे कुत्र्याची दोरी किंवा साखळी ठेवून घेऊ लागला. त्यामुळे आता कुत्र्याचे खूप हाल होऊ लागले. हे हाल  आजूबाजूला असणाऱ्या लोकांना बघवत नव्हते.मग एका व्यक्तीने त्या कुत्र्याच्या गळ्यातील साखळदंड काढून टाकला आणि कुत्र्याला मोकळे केले. आता मात्र त्या भिकाऱ्याला कुत्र्याची एवढी सवय झाली होती की,त्याला कोणतेच काम करता येईनासे  झाले. सगळ्यांना वाटले आता खरं याला शिक्षा मिळाली परंतु; तो कुत्रा पुन्हा त्याच्यापाशी  आला आणि पुन्हा त्या आंधळा भिकाऱ्याने त्याचा गळ्यामध्ये दोरी बांधली आणि पुन्हा तोच त्रास सुरू झाला. यावरून असं लक्षात येतं की आपण एखाद्याचा बरं करायला जात असेल,पण त्याला स्वतःमध्ये बदल करायचा नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. 

  ६) अनुकंपा:

             कथेमध्ये एका अशक्त प्रवासी रेल्वे मध्ये असतो आणि दुसरा प्रवासी त्याला त्रास देत असतो. याला बघणारे लोक काहीच करताना दिसत नाहीत. असा प्रकार बराच वेळ चालल्यानंतर  'राजम ' ही व्यक्ती या गोष्टी पाहत असते.त्या अशक्त प्रवाशाची बाजू घेत असताना राजम "मी तुझ्या उजव्या गालावर थापड मारीन आणि त्याच वेळेस तुझा डावा कान ओढून धरेन आणि तुझं तोंड जे आता कानाखाली आहे, ते चटकन डाव्या कानाखाली जाऊन बसेल आणि आणखी काही नाही. तुला कसल्याही वेदना होणार नाहीत" असे वाक्य बोलतो.आणि त्यावेळी तो दुसरा प्रवासी त्या डब्यातून पळून जातो. ही कथा खूप मजेशीर अशी आहे. 

७) वाघाचा पंजा 

            या कथेमध्ये एक गोष्टवेल्हाळ वाघाची तीन बोटं नसणे, त्याबद्दल रचलेली कथा सांगत असतो.गावात काही शिकारी लोकांनी, वाघाला मारल्याबद्दलची मिळालेली ट्रॉफी याची चर्चा चाललेली असते. त्यावेळी एक व्यक्ती आपली कहाणी सांगायला सुरुवात करतो. त्यात तो सांगतो की, तो एका कंपनीचा एजंट असताना, प्रचारासाठी एका दुर्गम भागात तो गेला होता. तिथे वाघांचा वावर असतो हेही त्याला ऐकायला मिळले होते. पण तरीही तो तिथे गेला,एका ठिकाणी थांबला होता. आणि काही वेळाने एक वाघ तिथे आला. त्यावेळी त्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला होता. हातात काही नसताना, त्याने एका चाकूच्या साहाय्याने त्या वाघाची तीन बोटं कापली होती. आणि शिकार केलेला वाघ तोच आहे, असे त्याचे म्हणणे होते. त्यालाही थोड श्रेय मिळायला हवे,असे त्याचे मत मांडून तो तिथून निघून जातो. तो गेल्यानंतर, हे ऐकणारे त्या वाघाला जाऊन पाहतात तर, त्या वाघाला ही तीन बोटे नव्हती.  कथेमध्ये कथा असे सुंदर स्वरूप याठिकाणी पाहायला मिळते.

८)  ईश्वरन: 

        या कथेमध्ये 'ईश्वरन ' हा मुलगा आहे , जो बऱ्याचदा दहावीची परीक्षा देत असतो.पण जर वेळेस नापास होत असतो. ज्यावेळी निकालाचा दिवस असतो,  त्यावेळी त्याला आपण पास झालोय आणि घोड्यावरून बसून आनंद व्यक्त करतोय, असे स्वप्न पाहताना दिसतो. पण खरे तर तो नापास झालेला असतो आणि सकाळी त्याचा मृतदेह नदीत सापडतो. नेहमी येणाऱ्या अपयशामुळे या मुलाने नदीमध्ये आत्महत्या केलेली असते. यातून माणसाच्या मनाचा अंदाज लागत नसल्याचे लक्षात येते.

९) परिपूर्ण कलाकृती 

            यामध्ये एक कलाकार नटराजच्या मूर्तीची अद्वितीय कलाकृती बनवितो. सर्वजण ही कलाकृती पाहून जातात, पण यात काही तरी चूक करावी नाहीतर गावावर संकट येईल असे सांगतात. पण तो कलाकार काही ऐकत नाही  आणि गावामध्ये  वादळी पाऊस  पडतो. वादळ ओसरल्यावर झालेल्या पडझडीत त्या मूर्तीची करंगळी तुटलेली दिसते. आणि सर्वांना आनंद होतो, त्यानंतर त्या मूर्तीची स्थापना केली जाते. यातून जगात कोणतीच गोष्ट परिपूर्ण असतं नाही आणि जरी असली तरी त्याला धोका संभवतो, हे या कथेच्या माध्यमातून सांगितले आहे.

१०) बाबांची मदत: 

          एके दिवशी या कथेतील मुलगा 'स्वामी ' याला शाळेत जावेसे वाटत नसते. पण यासाठी कारण सांगायला पाहिजे असते. मग तो त्याचे भूगोलाचे शिक्षक किती वाईट आहेत आणि मारतात असे रंगवून सांगतो. हे समजल्यानंतर त्याचे वडील शिक्षकांना पत्र लिहितात. आणि ते देण्यासाठी स्वामिला शाळेत जायला सांगतात. खरे तर भूगोलाचे शिक्षक क्रूर नसतात. मग त्यांनी मारावे म्हणून शाळेत गेल्यावर स्वामी कसेही वागायला लागतो. पण ते शिक्षक त्या दिवशी त्याच्यासोबत काहीही वाईट वागत नाहीत. त्यामुळे त्याने ठरवलेला प्लॅन यशस्वी होत नाही. मग ते लेटर घेऊन स्वामी घरी येतो आणि ते पत्र शिक्षकांना देत नाही. त्यावेळी त्याचे वडील म्हणतात की, इथून पुढे काही झाले तरी मी तुला मदत करणार नाही. या कथेमधून लहान मुलांची निरागसता  खूप छान पद्धतीने समजते.

११) नागाचे गाणे: 

          या कथेमध्ये एक गोष्टवेल्हाळ आपली कथा सुरु करतो. त्यामध्ये तो सांगतो की, त्यालाही संगीताची खूप आवड होती. पण ज्यावेळी तो तन्मयतेने बासरीवर नाग धून वाजवायला सुरुवात करतो. आणि या साधनेमुळे एक नाग त्याच्या समोर येऊन उभा राहतो. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो ती नागधून  रात्र भर वाजवत राहतो. ती धून वाजविणे बंद केले, तर तो नाग चावायला येईल अशी भिती त्याला वाटत राहते. आणि त्या दिवसापासून तो  पुन्हा बासरी वाजवणार नाही,असे ठरवितो. अशा प्रकारे ही कथा खूपच मजेशीर आहे.

१२) इंजिनचा वैताग: 

           एका व्यक्तीला लॉटरीमध्ये 'रोड रोलर ' लागलेला असतो. तो व्यक्ती सुरुवातीला खूप खुश होतो आणि आपण याच्यातून कमाई करू शकेल असे त्याला वाटते.पण ज्यावेळी लॉटरीवाला तिथून निघून जातो,  रोड रोलर त्या मैदानात ठेवून जातो.आणि तेव्हापासून त्या व्यक्तीची परीक्षा सुरू होते. ते इंजिन त्याच मैदानात राहिलेले असते. मग दररोज तो, ते इंजिन पाहून जात असतो. पुढे काही दिवसांनी त्या ठिकाणी पशुप्रदर्शन आयोजित केले जाते. आणि त्यावेळी हे इंजिन हलवण्याची मागणी होते. मग तेव्हा अनेक गोष्टी करून ते इंजिन हलवण्यासाठी प्रयत्न केला जातो, त्यासाठी त्याला खूप खर्च येतो. तरी इंजन हालत नाही, मग शेवटी कसेबसे करून ते इंजिन त्यांच्या घराजवळ आणले जाते. या सर्वामध्ये त्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. ते इंजिन हलविण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, त्यातून खूप गमतीजमती घडतात. शेवटी एका विहिरीच्या तोंडाला एका वादळामुळे तो रोड रोलर जाऊन बसतो. आणि या इंजिनचा वैताग संपतो. अशा प्रकारे ही कथा वाचताना खूपच मजा येतो.

१३) महिना पंचेचाळीस रुपये: 

          या कथेमध्ये शांता,तिच्या वडिलांची नेहमी मूवी पाहण्यासाठी जायला वाट बघत असते.पण कामाच्या व्यापात असल्याने ते तिला वेळ देऊ शकत नव्हते मग ती मुलगी वाट बघून थकून नेहमी झोपून जात असते.एके दिवशी वडिलांचा पगार वाढलेला असतो, पण मुलगी झोपलेली असते.यावरून एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये, मनात किती असले तरी, ती व्यक्ती तिच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नसल्याचे या कथेमधून समजते. 

१४)  व्यवसायाबाहेर:

           या कथेमध्ये एक व्यक्ती ग्रामोफोन कंपनीमध्ये कार्यरत होती. कंपनीमध्ये फायदे खूप होत होते, परंतु अचानक ग्रामोफोन कंपनी बंद पडली. आणि त्यामुळे या व्यवसायिकावर खूप मोठे संकट ओढवले.  त्या दिवसापासून ही व्यक्ती नै राश्येमुळे वर्तमानपत्रांमध्ये येणारे  शब्दकोडे सोडवू लागला. आणि त्यातून पैसे मिळतील अशी आशा त्याला वाटू लागली. त्यासाठी तो आपल्या बायकोबरोबर भांडण काढून पैशाची मागणी करू लागला. बरेच रुपये खर्च केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, हा पैसे कमवण्याचा मार्ग नाही आणि आपल्या जगण्यात काही अर्थ नाही. त्याच्या बायकोने मात्र एक वेगळा विचार त्याच्याकडे मांडला आणि तो म्हणजे त्यांचा बंगला विकून, व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. अशाप्रकारे ही कथाही आपल्याला जीवनात कितीही संकट असली तरी त्यातून योग्य तो मार्ग काढायला हवा याबद्दल शिकवते. 

१५) ॲटीला :

         एका घरामध्ये घरमालकांनी एक कुत्रा पाळला होता, तो कुत्रा इतका भित्रा होता की, घरात कोणी चोर जरी शिरला तरी तो त्याला काही करणार नाही असेच पाहणाऱ्याला वाटत होते. घरातल्यानाही नेहमी तसेच वाटत होते.एके दिवशी हा कुत्रा अचानक गायब झाला. त्याची कथा अशी होती की, त्यांच्या घरामध्ये रंगा नावाचा चोर शिरला आणि तो चोरी करून घरातून बाहेर पडला. तो कुत्रा रंगाच्या पाठीमागे जायला लागला. त्याला आता मोकळ्या हवेमध्ये खूप छान वाटत होते. त्या दिवसापासून रंगा जिथे असेल तिथे हा कुत्रा राहायला लागला. एके दिवशी या कुत्र्याला घरातल्या कुणीतरी त्या ठिकाणी पाहिले.  मग ते त्या कुत्र्याच्या पाठीमागे लागले पण तो कुत्रा मात्र रंगाच्या पाठीमागे पळायला लागला. रंगाही पळू लागला आणि पळता - पळता रंगाजवळ असणारे दागिने खाली पडले आणि सगळीकडे मग चोर पकडला असे म्हटले जाऊ लागले. अशाप्रकारे चोरी करणारा रंगा आणि त्याच्या पाठीमागे धावणारा ॲटीला कुत्रा अशी खूपच मजेशीर कथा लेखकाने वाचकांसमोर मांडली आहे.

१६) कुऱ्हाड: 

             या कथेमध्ये मालक आणि त्यांच्या घरामध्ये काम करणारा घरगडी 'वेलन ' याच्या अतूट नात्याची गुंफण केली आहे. वेलन हा गरीब परंतु; प्रामाणिक गडी होता.तो प्रत्येक काम अतिशय प्रामाणिकपणे करायचा, त्यामुळे सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास होता.  त्या बंगल्यामध्ये त्याने अनेक झाडे लावली होती. पुढे मालकांच्या जाण्यानंतर त्यांच्या मुलांना, त्या बंगल्यामध्ये चांगले वाटत नव्हते. एके दिवशी त्यांनी तो बंगला विकण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी कुऱ्हाडीच्या साह्याने वेलनने  लावलेली झाडे तोडली जाऊ लागली. त्यावेळी पळत पळत येऊन वेलन त्यांना कुऱ्हाडीने त्या झाडांना तोडू नका, त्यांना वेदना होत असतील असे म्हणत होता. या कथेमधून झाडाप्रती  असणारे प्रेम या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून आपल्याला समजते. 

१७) लॉली रोड 

                या कथेमध्ये एका पुतळ्याबद्दल सांगितले आहे. या पुतळ्यामुळे झालेली गंमत या कथेत सांगितले आहे. एक व्यक्ती, या पुतळ्याची आपल्याला जास्त किंमत येईल म्हणून खरेदी करतो.परंतु;तो पुतळा खूपच लांब असल्याने तो ठेवण्याची अडचण निर्माण होते. ह्या त्याच्या पुतळ्यामुळे त्याची बायका पोरही त्याला सोडून जातात. मग हा  पुतळा तो आपल्या घरामध्ये ठेवतो पण तो घरामध्ये बसत नाही तर अर्धा पुतळा घराच्या बाहेर आलेला असतो. या पुतळ्या मुळे त्या व्यक्तीला खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. पुढे ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचे घर होते तेथेच तो पुतळा उभा करण्याचे ठरवले जाते.हा पहिल्यापासूनचा शेवटपर्यंत पुतळ्याचा प्रवास खूप काही शिकवून जातो.

१८) हिरव्या ब्लेझरच्या मागावर 

           या कथेमध्ये एका चोराचे आणि हिरवे ब्लेझर घातलेल्या माणसाचे खूप सुंदर पद्धतीने चित्रण केलेले आहे. हा चोर बऱ्याचदा चोरी करीत असतो. असाच एकदा तो या व्यक्तीच्या खिशातून पाकीट चोरतो, त्यात त्याला फुगे सापडतात.मग हा चोर पहिल्यांदा विचार करतो आणि माणुसकीच्या भावनेतून ते पाकीट पुन्हा त्याच्या खिशात ठेवण्यासाठी जातो, आणि सापडतो. अशा प्रकारे, यातून त्या चोराची झालेली गंमत पाहायला मिळते.

१९) बळीचा कोपरा 

            सिनेमाच्या टाकीच्या समोर रामाचे  हॉटेल असते.आणि त्या ठिकाणी  दंगा झाल्यामुळे त्याच्या हॉटेलवर गिऱ्हाईकांची संख्या कमी होते. ती घटना त्याच ठिकाणी झाल्यामुळे, पोलीस रामाला ते  हॉटेल दुसऱ्या ठिकाणी हलवायला सांगतात. आणि त्याच्यापुढे एक दुसऱ्या व्यक्तीचे हॉटेल असते, ते मात्र जोरात चाललेले असते.  हॉटेल बंद पडल्यामुळे आणि धंदा होत नसल्यामुळे पुढे रामा दुसऱ्या एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी जातो आणि त्यावेळी काहीतरी वेडेवाकडे बोलल्यानंतर, रामा आपण एका हॉटेलचा मालक असल्याचे सांगतो. या कथेमधून कुठलीही परिस्थिती कायम राहत नाही, तर बदल होत असतो हे लक्षात येते. आणि लेखकाने ते अत्यंत सुंदर पद्धतीने या कथेमध्ये सांगितलेले आहे.

२०) बायकोची सुट्टी 

              आपली बायको आपल्या मुलासह माहेरी गेल्यानंतर कानन नावाचा व्यक्ती घरामध्ये असणारे सामान शोधायला सुरुवात करतो. त्यामध्ये त्याला पैशाचा एक डब्बा सापडतो. तो डब्बा फोडून तो घराबाहेर जातो आणि पैसे खर्च करून येतो. आणि ज्यावेळी त्याची बायको व मुलगा परत येतो आणि त्याचा मुलगा आपल्याला त्या डब्यामध्ये पैसे टाकायचे आहेत, असं सांगतो. त्यावेळी  आता या मुलाला काय उत्तर द्यायचे,असा विचार तो करू लागतो. या कथेमध्ये रिकाम्या माणसाच्या मनामध्ये कोणते विचार येतील ते सांगता येत नाही आणि त्यातूनच तो काय करेल याचीही शाश्वत देता येत नाही असा बोध मिळतो.

२१) छाया 

               या कथेमध्ये एक मुलगा आणि आई यांचे चित्रण केलेले आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे आई दुःखात असते परंतु; त्यांच्याच वडिलांनी मुख्य भूमिका केलेला एक फिल्म पडद्यावर येते. तो पिक्चर पाहण्यासाठी मुलगा आईला विचारतो, पण आई यायला तयार नसते. मुलगा मात्र रोज तो पिक्चर बघत असतो आणि त्याला त्याचे वडील परत आल्यासारखे वाटत असते. एके दिवशी आईलाही तो आग्रह करून तो चित्रपट पाहण्यासाठी नेतो. आईचा  त्या ठिकाणी जाते, त्यावेळी तिला तो चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या नवऱ्याची प्रकर्षाने आठवण येते.आणि या प्रसंगातून एखादी व्यक्ती या जगातून जरी निघून गेली तरी, चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तीला पाहत असताना मुलाला होणारा आनंद आणि आईला होणारे दुःख आणि  या दोन्ही भावनांचे मिश्रण  कथा वाचत असताना लक्षात येते. सुख आणि दुःख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे एखादी घटना जरी सारखी असली तरी, त्याबाबतीत दोन व्यक्तींचा असणारा दृष्टिकोन मात्र वेगवेगळा असू शकतो हे या ठिकाणी समजते.

२२) इच्छेने झालेली गुलाम:

            या कथेमध्ये खूप वर्षापासून एका घरामध्ये काम करत असलेल्या मोलकरणीची कहानी सांगितले आहे.त्या मोलकरणीला घरातील सर्वजण अय्या म्हणत असत. आणि ही अय्या घरातील प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेत असते. बरेच वर्षे राहिल्यानंतर एक दिवस तिचा नवरा तिला न्यायला येतो आणि पुन्हा ती आपल्या नवऱ्याबरोबर जायचं ठरवते.यावेळी घरातल्या सगळ्यांना दुःख होते परंतु; ती मात्र आनंदात असते.यातून कोणताही व्यक्ती जरी गड्यासारखी काम करत असली तरी, त्याला आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर राहण्यामध्येच आनंद वाटत असतो. हे या हे यामधून लक्षात येते.

२३) लीलाचा मित्र

                यामध्ये लीला नावाची एक लहान मुलगी दाखवलेली आहे.  त्यांच्या घरामध्ये सिद्धा नावाचा एक नोकर काम करण्यासाठी येतो.तो प्रत्येक काम खूप प्रामाणिकपणे करत असतो.  लीला आणि तो नोकर खूप चांगले मित्र बनलेले असतात. पण एके दिवशी लीलाची चैन सापडत नाही आणि त्यामुळे सर्वजण सिद्धला गुन्हेगार म्हणून दोषी ठरवितात. ज्यावेळी त्याला पोलिसांच्या हवाली केले जाते, त्यावेळी त्याच्याबद्दल असं समजते की तो पूर्वी एक गुन्हेगार होता. ज्यावेळी त्याला पकडून नेलं जातं,त्यावेळी लीला खूप रडते.पुढे काही दिवसांनी लीलाच्या गळ्यातील चेन दुसरीकडे सापडते .यातून सिद्धा निर्दोष असल्याचे लक्षात येते परंतु; आपल्या घरात गुन्हेगाराला ठेवू नये या भावनेतून ते त्याला पुन्हा कामाला बोलावत नाहीत. या कथेमधून मैत्रीमध्ये कशाचाही विचार केला जात नाही आणि ती निखळ असते, हे समजत असले तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी पाहूनच  व्यक्तीला ठरवलं जातं, हे सुद्धा या ठिकाणी लेखक सांगण्याचा प्रयत्न करतात.

२४) आई अन् मुलगा : 

    या कथेमध्ये आई आणि मूलगा, या दोघांच्या आपापल्या भावना स्पष्ट होतात. आपला नवरा गेल्यानंतर एकटी पडलेली आई, आपल्या मुलावर नेहमीच आरडा- ओरडा करत असते.त्यामुळे मुलाला आईबद्दल प्रेम वाटेनासे होते. तो बऱ्याचदा नैराश्याच्या स्थितीमध्ये असतो परंतु; ज्यावेळी आई एकांतात विचार करते, त्यावेळी तिला हा प्रश्न पडतो की, आपण मुलाला जास्त दबाव द्यायला नको आहे. आणि एके दिवशी तिला असा भास होतो की, आपल्या मुलाने काहीतरी करून घेतलेले आहे. पण  रात्री मुलगा परत येतो, त्यावेळी तिला खूप आनंद होतो.

२५) नाग 

               या कथेमध्ये वडील, मुलगा, माकड, नाग यांचे सुंदर पद्धतीने वर्णन केलेले आहे.वडील आणि मुलगा नागाचा खेळ करून पैसे कमवत असतात. एके दिवशी त्यांना एक माकड दिसते,त्या माकडाला ते घरी आणतात, त्याला खेळ शिकवतात.आणि तेव्हापासून त्यांची खूप कमाई व्हायला लागते. काही दिवसांनी वडील एका बाईच्या नादाला लागतात आणि मुलाला एकटेच सोडून त्या माकडा ला बरोबर घेऊन नागाला सोडून  निघून जातात. मुलाला हे कळल्यानंतर तो असा ठरवतो की, नाग आता म्हातारा झाला आहे, त्याला खेळ होत नाही. त्यामुळे तो त्या नागाला एका माळरानावर सोडायचे ठरवतो. तो ते टोपले ठेवून येतो आणि मुलगा पुढे जायला लागतो तेव्हा वरून पक्षी त्या टोपलीकडे झेप घ्यायला लागतात. आणि हा त्या ठिकाणी तसाच थांबलेला असतो, मग तो मुलगा तिथे पळत जाऊन ते टोपली घेतो आणि नागाला कायमस्वरूपी आपल्याजवळ ठेवण्याचा निर्णय घेतो. यावरून असे लक्षात येते की, या मुलालाही त्या नागाने सुरुवातीच्या काळात केलेल्या मदतीची जाणीव होते. परंतु दुसऱ्या बाजूला वडील कोणताही विचार न करता आपल्या मुलाला एकटे सोडून कसे काय जाऊ शकतात? हा पण प्रश्न मनामध्ये निर्माण होतो.

२६) सेल्वी 

          ही कथा आहे एका गाने गाणाऱ्या ' सेल्विची '. ही एका गरीब वस्तीत राहत असते. आणि तिथे तिच्यातील गायकीला ओळखून एक व्यक्ती तिला गाण्यासाठी घेऊन जातो. प्रत्येक शोमध्ये ती भरपूर पैसे कमवते परंतु; त्या पैशाचा मालक तिला गायनासाठी घेऊन जाणारी व्यक्तीच असते. कुठे जायचं, कुठले कार्यक्रम करायचे, या सर्व गोष्टी तो व्यक्तीच ठरवत असते. स्वतःच्या घरातल्यांच्या कडे यायला सुद्धा तिला तो पण परवानगी देत नसतो. एक वेळेस अशी येते की. ज्यावेळी ती घरातल्यांना पाहण्यासाठी येते. त्यावेळी ती त्याच्याबरोबर न जाण्याचा निर्णय घेते. आणि यावरून असे लक्षात येते की, ती स्वतंत्र निर्णय घेते आणि पैसे न घेता कार्यक्रम करायला सुरुवात करते. तिचा हा निर्णय त्या व्यक्तीला अजिबात आवडत नाही. तो बऱ्याचदा तिला समजावण्याचा प्रयत्न करतो परंतु;  तिने निर्णय घेतलेला असतो. आणि ही कथा वाचत असताना, एक स्त्री आपले स्वतंत्र विचार असल्यामुळे ,स्वतंत्र निर्णयही घेऊ शकते  हे लक्षात येते त्यामुळे ही कथा खूपच सुंदर आहे.

२७) दुसरं मत:

            एक मुलगा आणि त्याच्या आईची त्याच्या लग्नाबद्दल चाललेली धडपड या कथेच्या माध्यमातून लेखकाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मुलाला लग्न करायचे नसते, पण आईला वाटत असते की आपला डोळ्यादेखत आपल्या मुलाचे चांगले व्हावे. सुरुवातीला त्याला हे विचार पटत नाहीत, पण काही काळाने तो एकटा बसून विचार करतो. त्यावेळी त्याला पटतं की,आपली आई आहे तोपर्यंत आपण लग्न करायला हवे. प्रत्येक गोष्टीमधून तो दोन मते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दोन्ही मतांमधून कोणता निर्णय योग्य हे पाहत असतो.  आणि तो स्वतःचा विचार न करता आता आईचा विचार करायला लागतो. म्हणजे सुरुवातीला कथेमध्ये मुलाचा असणारा विचार कथा संपत असताना बदलतो,त्यामुळे ही गोष्ट खूपच छान वाटते.

२८) मांजर घरात: 

              ही कथा खूपच मजेशीर आहे.एका चाळीमध्ये अनेक कुटुंबे राहत असतात. आणि त्यामध्ये एकदा एका दुकानामध्ये एक मांजर शिरते. आणि त्या मांजराचे डोके एका चंबूमध्ये अडकते. ते मांजर त्यातून तोंड बाहेर काढण्यासाठी इकडे - तिकडे करायला लागते.आणि त्यामुळे ह्या दुकानातून आवाज यायला लागतो. त्यावेळी चाळीमध्ये एक साधू राहत असतो.आणि तो असा दावा करतो की, या दुकानात भूत आहे. मग सर्वजण आपापली मते मांडतात आणि ती सर्व मते वाचताना खूपच हसायला येते. शेवटी तो साधू काय झाले हे पाहण्यासाठी दुकानात जाण्याचे ठरवितो.  आतही  गेल्यानंतर तो घाबरत घाबरतो तेथे जातो त्यावेळी तोही खूप घाबरून जातो. आणि काही वेळाने त्या चंबूमधन तोंड सोडवून घेऊन, ते मांजर पळून जाते.

२९) धार : 

          रंगा आणि नसबंदी याच्यावर ही कथा आधारित आहे. रंगा आपले काम नीटनेटकेपणाने करत असतो. परंतु; त्याला जास्त पैसे कमवावेसे वाटत असे. तो धार लावण्याचे काम करत असतो.आणि त्यातूनच जे पैसे  पैसा मिळतील, तो आपल्या बायकोकडे देत असतो.पण त्याच्या बायकोची अपेक्षा जास्त असते.त्यासाठी तो एका गावामध्ये जातो. तिथे गेल्यानंतर काही माणसे त्याला पकडून नेतात आणि काही जास्त रक्कम देणार असल्याचे सांगतात. आणि त्याला  कॉटवर झोपवतात. आणि यानंतर सर्व डॉक्टर त्याच्या शेजारी येऊन धारदार हत्यारे घेऊन येतात. त्यामुळे त्याला कल्पना येते की, नसबंदी करायला हे  आपल्याला घेऊन आलेले आहेत.त्यावेळी तो त्यांना बाजूला सारतो आणि धावत पळत तिथून निसटतो. यातून काही वेळेस आपल्याला जसं वाटत तसं नसतं तर  काहीतरी वेगळच असतं, हे या कथेच्या माध्यमातून लेखक आपल्याला सांगतात.

३०) ईश्वर आणि चांभार: 

          या कथेमध्ये एक चांभार नेहमी आपले काम करत असतो. आणि त्या ठिकाणी असणारा एक व्यक्ती 'हीप्पी ' नेहमी,त्या चांभाराचे निरीक्षण करत असतो ,त्याला त्याचे आयुष्य खूप छान वाटते. मग तो हिप्पी त्याला नेहमी प्रश्न विचारतो. त्या दोघांना पण एकमेकांबद्दल कुतुहुल असते.  एके दिवशी हिप्पी एक देवाची मूर्ती चांभारापाशी देतो.  त्यावेळी देवही चोरी करतो असेच त्या चांभाराला वाटते.

३१) भुकेला पोरगा : 

            यामध्ये एका या व्यक्तीची ही कथा आहे.तो फिरत असताना त्याला आपल्या पत्नीची आठवण येते, ती त्याला सोडून गेलेली असते. तिचा विचार त्याच्या मनामध्ये चालू असताना, त्याला एक पोरगा चुकलेला आहे हे ऐकायला मिळतं. मग तो त्या मुलापाशी जातो, त्याला खायला देतो. त्याच्याबरोबर बराच वेळ घालवतो, त्याला खूप आनंद मिळतो.  पण पुढे गेल्यानंतर ज्यावेळी त्याला त्याचे आई- वडील दिसतात, त्यामुळे तो पळत- पळत जाऊन त्यांना बिलागतो. एखादे लहान मूल कितीही बाहेर असले तरी शेवटी आपल्या लोकांपाशी येते हे या कथेमधून समजते.

३२) एमडेन :

           या कथेमध्ये एक व्यक्ती आपले वय झाल्यानंतर, त्याला त्याच्या तरुणपणी घडलेल्या एका अपराधाची जाणीव होते. जास्मिंच्या सुवासाची एक बाई त्याच्या आयुष्यात आलेली असते. मग खूप वेळ गेल्यानंतर, त्याला असं वाटतं की, याची परतफेड करावी.तिची माफी मागावी म्हणून, तो तीन रुपयांची जिलेबी घेऊन तिला देण्यासाठी तिचे घर शोधू लागतो. परंतु त्याला ते घर सापडत नाही आणि हातात घेतलेली जिलेबी खाली पडते आणि कुत्रा ते खाऊ लागतो. त्यावेळी त्या व्यक्तीला असं वाटतं की, कदाचित आपण तिला शोधत आहोत,ती या जगात नसेल आणि तिचा पुनर्जन्म झाला असेल व ती ही जिलेबी खायला आली असेल. अशा प्रकारे ही कथाही खूपच सुंदर आहे.

            अशाप्रकारे या पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्वच कथा खूपच सुंदर आहेत. मुख्यतः या कथेमध्ये वर्णन केलेल्या व्यक्ती  आपल्या डोळ्यांसमोर, आहे तसे उभी करण्याचे काम लेखकाची लेखणी करते. हे पुस्तक एकदा हाती घेतल्यानंतर ठेवावेसे वाटत नाही. कारण आजूबाजूलाही अशा प्रकारचे प्रसंग, अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्याला भेटत असतात. त्यामुळे हे पुस्तक खूप जवळचे वाटते. आणि ह्या घटना जणू काही आपल्या आसपासच घडत आहेत, असे वाटते. मी जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतलं, त्यावेळी पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला त्या पुस्तकांनी घट्ट पकडून ठेवले आणि त्यामुळे प्रत्येक वाचकांनी हे पुस्तक नक्की वाचायला हवं असं मला वाटतं.


Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...