Skip to main content

तहानलेल्यांच्या व्यथा, वेदना आणि आयुष्य जाणून घेण्यासाठी लेखक "सदानंद देशमुख" यांची "तहान" ही कादंबरी नक्की वाचा.Short Summary

       


                                          "सदानंद देशमुख" लिखित  "तहान " कादंबरीचे मुखपृष्ट

           ज्या ठिकाणी शेती पावसाच्या पाण्यावर फुललेली आहे, पाण्याची टंचाई नाही त्या ठिकाणी पाण्याची किंमत कळत नाही. पण ज्यावेळी सदानंद देशमुख लिखित "तहान "ही  कादंबरी आपण वाचतो ,तेव्हा पाण्याच्या एका थेंबाची किंमत समजल्याशिवाय राहत नाही. हे पुस्तक वाचताना पाण्याच्या एका- एका थेंबासाठी तळमळणारे लोक, दुष्काळी गाव, पाण्याअभावी त्यांच्यासमोर उभ्या असणाऱ्या असंख्य समस्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. एक लहानस गाव, गावात आपला संसार थाटणारे गावकरी, शेती बरोबरच काही जनावरे पाळणारे शेतकरी आणि पाण्याअभावी लोकांचे होत असणारी ससेहोलपट या सर्व गोष्टींचे चित्रण या कादंबरीमध्ये लेखक सदानंद देशमुख यांनी अत्यंत परिणामकारकपणे आणि मनाला अंतर्मुख करण्याचे हेतूने केल्याचे या ठिकाणी लक्षात येते. 

     या कादंबरीची सुरुवात मुरल्या आणि छबील्या  या बैलांच्या वर्णनामधून होते. सारंगपूर हे गाव आणि या गावामध्ये पडलेला दुष्काळ. हा दुष्काळ खूप  भयंकर असलेला दिसतो पण अशा परिस्थितीतही अत्यंत चांगल्या स्थितीत असणारे राघोजी शेवाळे यांचे मुरल्या आणि छबील्या  हे बैल. सगळ्या गावावर ते संकट असताना या नंदीची  सुदृढ शरीरयष्टी  बघताना  गावाला कौतुक करताना शब्द अपुरे पडताना पाहायला मिळतात. राघोजी  शेवाळे यांचा मुलगा बबन शेवाळे,बायको रामकोर, मुलगी वर्षा आणि त्यांच्या गावात पाण्याअभावी उद्भवलेली दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि त्यांचे असणारे मुरल्या  आणि छबील्या  हे नंदी या सगळ्याभोवती हि कादंबरी फिरताना दिसते. कादंबरीच्या सुरुवातीला जे वर्णन केले आहे, त्यामध्ये पाणी नसल्यामुळे विहिरी कोरड्या पडल्यामुळे गावात जे माणसांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल चाललेले दिसत आहेत. या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये विहिरी आटलेल्या आहेत तरीही ज्या ज्या ठिकाणी विहिरीत  थोडे पाणी आहे त्या ठिकाणी ओंजळ- ओंजळ पाण्यासाठी लोकांची गर्दी  उसळलेली दिसत आहे. प्रत्येकापुढे तहान शमवण्यासाठी, पाणी मिळवण्यासाठी मोठमठे भांडणेही होताना दिसत आहेत. सगळ्यांमध्ये गारमाळ्याच्या विहिरीत तेवढे पाणी शिल्लक होतं. पण त्या पाठीमागे कारण होतं, ते पाणी आणताना त्या ठिकाणी पिराचा चढ होता आणि तो चढ एवढा घातक होता की अनेक अपघात त्या अगोदर, त्या ठिकाणी घडलेले  होते. त्यामुळे कोण आपले बैल त्या चढाला न्यायला धजावत नसत. पण एकदा अपघाताने बबन शेवाळे आपले दोन्ही बैल मुरल्आया णि छबिल्याला घेऊन त्या गारमाळ्यातील विहिरीतून पाणी घेऊन पिराचा चढ  अगदी सहज चढून आला होता. 

       राघोजी शेवाळेने आपल्या बैलांना ऐन दुष्काळातही अतिशय चांगल्या स्थितीत ठेवले होते. त्यांचे मांस लद्लद करत  होते, इतकी चांगली बैलांची तब्येत राघोजीने राखली होती. माणसांना ओंजळभर पाण्यासाठी भांडावे लागत होते त्यातच बबन पाण्याची खेप घेऊन चालला होता. बैल पिराचा चढ सहज चढून गेल्यावर गावातील गावकरी बैलाचे आणि त्या बैलांची काळजी घेणाऱ्या राघोजीचे खूप कौतुक करत होते. त्या दिवसानंतर मात्र रोज बबन या बैल जोडीला घेऊन पाण्यासाठी येऊ लागला. या सगळ्या गोष्टी करत असताना एके दिवशी बबनला स्टैंडवर अडवून एका हॉटेलवाल्याने एका टाकीला शंभर रुपये देतो, पण पाणी देण्याची विनवणी केली. आणि त्या दिवसापासून प्रत्येक जण बबनला पैशावर पाणी मागू लागले, त्याचा चांगला धंदा होऊ लागला. घरात पंखा, टीव्ही ,मिळणाऱ्या पैशातून त्याने आणला, आठवड्याला मटन आणू लागला. नवऱ्यासोबत बरिच  वर्षे संसार करून कधीही कोणतीच गोष्ट मिळाली नाही.त्यामुळे मुलाच्या या पाणी विकण्याचा धंदा करून मिळणारा पैसा, त्याच्या आईला आनंदी करत होता. दर दिवशी ताजा पैसा हातात येत होता. पण या सगळ्यांमध्ये राघोजीला मात्र बैलांची खूप काळजी वाटत होती. स्वतःच्या भावाप्रमाणे या बैलांची काळजी घेतली होती. या रोजच्या कामामुळे बैलांची काया सुकून  गेली होती. पाण्याशिवाय सगळीकडे भयंकर ओसाडपण आले होते. हे भकासपण अतिशय जीवघेण्या स्वरूपाचे भासत होते . लोक एकमेकांना घरात जेवून जा म्हणत होते पण पाण्याचा एक थेंबही द्यायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत बबनचा पाणी विक्रीचा धंदा तेजीत चालला होता. आणि त्याच्या आईला चार जास्तीचे पैसे मिळत आहे त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती तशीच राहावी असे वाटत होते. दिवसभर घागरीभर  पाणी मिळवण्यासाठी बायका-माणसे  ताटकळत बसलेले  होते.  गावातील अशीच अनेक दृश्ये  काळजाचा थरका उडवीत होती. 

         तहानलेल्या प्रत्येक जीवाला घोटभर पाण्यासाठी तळमळावे लागत होते. ही सगळी दृश्य एकापाठोपाठ घडत असताना पारखेड गावाला लागलेली आग,  त्या ठिकाणी गावावर आलेले  संकट, त्या ठिकाणचे असणारे दृश्य वाचकाला अस्वस्थ करून सोडल्याशिवाय राहत नाही. सारंगपूरमध्ये पारखेला आग लागल्याचे समजते आणि सर्वजण त्या गावाकडे पळू लागतात. त्या गावात गेल्यानंतर पुंजाजी जुमडे त्याच्यामुळे आग लागली असे समजून माती तोंडात घेऊन लोळत होता. त्याला बिडी फुकायची सवय होती आणि गाफीलपणे त्याने  ती बिडी गवतात फेकली. आणि त्याच्या या चुकीमुळे गावाने पेट घेतला असे त्याला वाटत होते. प्रत्येक जण आपापला जीव वाचवून पळत होता. डोंगरावर चरायला गेलेली जनावर सोडली तर बाकी सगळं काही जळून खाक झालं होतं. आग  विझ वायला पाणी कुठेही नव्हतं. प्यायला पाणी नव्हतं मग आग  विझवायला कुठून येणार? गावकऱ्यांच्या सगळ्या वस्तूंची राखरांगोळी झाल्यावर अग्निशामक दल दाखल झाले. पण प्रत्येकाने तहान भागवण्यासाठी ओंजळ खाली धरली होती. अनेकांची झालेली राखरांगोळी पुंजाजीला सहन झाली नाही आणि एका झाडाला त्याने फास लावून घेऊन आपले आयुष्य संपवले, आपल्या चुकीची शिक्षा स्वतःला करून घेतली. अशा प्रकारच्या बराच वाईट घटना घडत होत्या. नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन मिळाले पण पाण्याअभावी माणसांचे आयुष्य खऱ्या अर्थाने जळून गेले  होते. 

        सारंगपूर मध्ये प्रमोद नवले हा पत्रकार म्हणून काम करत होता. अनेक तरुण पुढे सरसावले आणि गावात पाण्याविना होणाऱ्या गावकऱ्यांच्या हालासाठी मोर्चे काढले, आंदोलने केली. आणि त्या मोर्चामध्ये बबनचा बाप राघोजी सामील झाला होता. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये पळताना राघोजी एका खड्ड्यात  पडला ,एक पाय कायमचा निकामी झाला. पण त्या आंदोलनामुळे गावात टँकर येऊ लागले  आणि दुसरीकडे बबन कडून कोणीही विकत पाणी घेईनासे झाले. बऱ्याच दिवसापासून मुरल्या आणि छबील्या पाणी आणायचे काम करत होते आणि या रोजच्या कामामुळे त्या बैलांचाही सापळा झाला होता. राघोजी एका जागेवर बसून हे सर्व बघत होता, त्याला बैलांचे कष्ट कमी झाल्यामुळे समाधान वाटत होते आणि त्यांच्यासाठीच तो मोर्च्यात सामील झाला होता. अजून एक घटना या दुष्काळी गावात घडली होती आणि ती म्हणजे बबन पाण्याचा धंदा करत असताना त्याला  झोपडपट्टीतली रत्ना पाण्यासाठी येऊन भेटत होती. दोघ एकमेकांची तहान भागवत होते. पण या गोष्टीची काही दिवसांतच गावात चर्चा सुरु होते. एक दिवस रत्ना पाण्यासाठी आली असताना तिचे वडील दोघांना पकडतात व बबनला खूप मारहाण करतात.बबनने पाणी विकून खूप पैसा कमावलेला आहे या भावनेतून तक्रार मागे घेण्यासाठी त्याच्याकडे दहा हजारांची मागणी करतात. पाण्याचा धंदा बंद असल्यामुळे तो आईजवळ ठेवलेले काही पैसे , टीव्ही विकून मिळालेले दोन हजार रुपये असे मिळून पाच हजार रुपये जमवतो आणि अब्रू जाऊ नये म्हणून तक्रार मागे घेण्याची विनंती करतो. पण पोलीस आणि इतर दोघे तिघे तेवढे पैसे घ्यायला कबुल होत नाहीत. त्यावेळी बबनला सुचायचे बंद होते. शेवटी पैसे कसे गोळा करायचे आणि आपण किती मोठी चूक केली,आता निस्तरायची कशी या काळजीने तो  घरातून बाहेर पडलेला दिसतो. दुसरीकडे राघोजीला मुलाच्या या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नसल्याने झुरत-झुरत , आपल्या बैलांचा , दुष्काळातील परिस्थितीचा विचार करत त्याचे आयुष्य संपल्याचे लक्षात येते.

          तहान भागविण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची किंमत दुष्काळग्रस्त सारंगपूर सारख्या गावांना माहिती असते. खरच  पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात  कशी परिस्थिती असू शकते, याची जाणीव हे पुस्तक वाचत असताना येते. हे पुस्तक काल्पनिक असले तरीही वास्तवाशी एकसंघ असणारे आहे, यातील प्रत्येक प्रसंग मनाला गंभीर करतात, रडवतात आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा विचार करायला भाग पाडतात. त्यामुळे प्रत्येक वाचाकाप्रेमीने हे पुस्तक वाचायला हवे आणि जाणून घ्यायला हवी तहानलेल्यांची व्यथा आणि वेदना .

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

"अनिल बर्वे" लिखित नाटक "आकाश पेलताना " short summary सारांश

           अनिल बर्वे लिखित नाटक   "आकाश  पेलताना " खऱ्या अर्थाने हे नाटक म्हणजे समाजकारण आपण कशाला म्हणतो आणि त्या पाठीमागे असणारे सत्य किती विदारक असू शकते, त्याचप्रमाणे यामधील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन या दोन्हीमध्ये मध्य साधत असताना जाणवणारे वास्तव मनाला सुन्न करून जाते. हे नाटक जरी काल्पनिक पात्रांना घेऊन लिहिले असले तरी त्यामध्ये  राजकारण कशा पद्धतीने असू शकते यावरही हे नाटक भाष्य करते.राजकारणाकडे बघत असताना सत्ताकारण आणि समाजकारण  कसे बदलते हे देखील या नाटकाच्या माध्यमातून लक्षात येते.            हे पुस्तक म्हणजे राजकारण आणि समाजकारण यामधील वास्तव परिस्थिती यावर विचार करायला भाग पाडते. या नाटकाची सुरुवात एका दृश्याने होते, ज्यात दोघेजण दारू पीत बसले आहेत आणि त्यांच्यात राजकारण आणि एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेले खून याबद्दल चर्चा चालली आहे. प्रत्येक गोष्ट घडण्यापाठीमागे एक व्यवस्था काम करत असते आणि तीच जर का भ्रष्ट असतील तर त्याठिकाणी चांगल्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. य...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...